शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

तुझं माझं नातं



तुझं माझं नातं
दूरस्थ
दोन शहरांच्या टोकावर
आशाभूत
व्याकुळलेलं

तू दिसत नाहीस मला
दिवस रात्र,
आठवडे,
महिने
तुझा आवाज पोचतो
दिवस रात्र,
आठवडे,
महिने
तुझा स्पर्श नसतो
दिवस रात्र
आठवडे
महिने
तुझी भावना पोचते
दिवस रात्र
आठवडे
महिने

थोडा है, थोडा बाकी
हट
बहुत बाकी
यातल्या एवढ्या तेवढ्या कशानेच
खरंतर
मला बरं वाटत नाही
ते वाटूनही घ्यायचं नाही,
नसतंच ना रे घ्यायचं...
दूराव्याने कुणाला बरं वाटलंय,आजवर?

मी तर
विरहानं, वासनेनं, वेदनेनं
गमगीन आहे
थोडी तुझी दिवानी
थोडी त्रासलेली आहे
तू हवाय म्हणताना
मला लाज नाही वाटत
तू हवाय म्हणताना
मी मुरकत ही आहे
तुझी रुखरुख जाणवते
तुझी हुरहूर वाटते…
सगळं एकावेळी दोन किंवा असंख्य
भावनांचा गुंता आहे

परंपरांची चौकट भेदत
प्रेम पोचलं आपल्यापाशी
अंतर का शाबूत आहे तरीही
वेदनेशी गाठ घालत?
जखमांचे व्रण सारे
स्पष्ट दिसतात
वियोगाची ठसठस सांग
कशी दाखवतात..

यार कोण कुठले
संस्कार,
जबाबदाऱ्या,
कर्तव्य, कोडीसाठी
कन्हत आहे
आपलं आयुष्य...
कणाकणाने
मरत आहे थोडं थोडं..

त्या सगळ्या
मर्यादांना मारूयात लाथ?
धरुयात सावली?
एकमेकांवर एकमेकांची

तुझं माझं नातं
मग
केवळ
बहरत
बढत
बरकरार होईल

शुक्रवार, १९ मे, २०२३

प्रियकरा

 

प्रियकरा

तुझ्या मनाच्या अस्थिर भोवऱ्याने

माझ्या पोटात गोळा आलाय

नाही, खोल खड्डासुद्धा पडलाय..

या अस्थिरतेतून

निघणारे तरंग, चक्र, आवर्तनं

माझा श्वास खेचतायेत

भोवऱ्याच्या निमुळत्या

केंद्राकडे...

मी जडशीळ, माझं शरीर जडशीळ

नसनसांत ठणक आहे

बेचैन प्रवाहांची

तुझी अस्वस्थता

माझ्या गर्भाशयापर्यंत

येऊन पोचलीये,

आता यातून केवळ सृजन व्हावं

तरच ठीक

अन्यथा अपुऱ्या वाढीचा

ठरलेला  गर्भपात...

मला सोसणार नाहीये, प्रियकरा!

ए, प्रियकरा...

तुझ्या अस्थिर, अस्वस्थ, बेचैन

कंपनांवर एकच फुंकर आहे

मला घट्ट मिठीत घे

गरगरून खाली जमिनीवर

कोसळण्याआधी...

 

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

कुछ अव्वल सा लिखते है

शुरु से शुरु करते है और फिर 
वही से खतम करते आते है
या फिर शुरु से शुरु करते है 
और कुछ अव्वल सा लिखते है
कहो तो, दिल के हजार टूकडों को 
एक ही बार में समेट लेते है
या कहो तो दिल को बिखरने से 
पहले ही संभाल लेते है

माजी में झाँककर 
उन हसीन शामों की
उन नीले अरमानों की
कुछ अदाई कर लेते है
या कुछ कुछ बाकी,
थोडा उधार दोनों ही रख लेते है

और मीठे से वो एहसास जो
हम ने साथ महसुस किये
खट्टी सी वो तकरारे
जिन्हे मिलके भूला दिये
हिसाब उनका भी पक्का कर लेते है
या कोई गलती बेमतलब रख देते है

क्या पता किस अरमान का
क्या है अंजाम
क्या पता किस अंजाम का
क्या है नया आगाज

खैर, सुनो
जान के अनजान बनने से बेहतर
इक दुजे के हमराज बनना है
या तो साहिर की कही बात
हथेली पर निशाँ करना है...
या तो फिर से अजनबी बन जाते
या खूबसूरत मोड़ लेकर
बुना अफसाना छोड देते है…

क्या आसान है बताओ
उस पर अमल करते है
शुरु से शुरु करते है और...

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

इतना तो हक है ना...

 इतना तो हक है ना...

मामूली सी तकरार हो 

हम उनसे खफा हो 

आँखों में नमी हो 

और वो हमे मनाने आए... 


इतना तो हक है ना...

भीगी भीगी आँखे हो 

होंठों से जरा छुले तो 

सिरहन बदन से दौड़ जाए 

और हम उनसे लिपट जाए 


इतना तो हक है ना...

कुछ कहे बगैर 

कोई जादू कर जाए 

मामूली तकरार को 

यूं हवा कर जाए 

और वो हमारी मुस्कान बन जाए 


इतना तो हक है ना...

बेइंतहा मुहब्बत से    

नजर भर देख वो 

नजरों सेही संवार ले 

और हम उनकी बाहों में  

खुद को फ़ना कर जाए 

बुधवार, १२ मे, २०२१

बायको आणि गुलाम!

अस्सा अस्सा संताप झाला होता. शरीर थरथरत होतं, रागानं. हृदयात कोळसा पेटला होता. धगधगत होतं सगळं तन-मन. वाटत होतं की होऊन जावं हिंसक. सोडून द्यावं स्वत:वरचं नियंत्रण आणि वाजवून द्यावी त्याला सण्णकन. साला दोन दिवस झाला तरी डोक्यातली ती कलकल संपत नाहीये.

काय प्रश्न विचारला होता त्याला... हेच ना, बाबा नवरा बायकोत भांडणं होत नाहीत?
इंग्रजीत शिंकणारं, पार्ट्या करत फिरणारं आणि स्वत:ला नखशिखांत मॉडर्न समजाणारं तो शाणपट्टी आधी मिश्किल हसला. मग म्हणाला, ‘देखो, रोजा है...कुरआन पाक की कसम दिला दो, दो साल हुए शादी को पर मेरे वाईफ ने एक बार भी पलटकर जवाब नहीं दिया!’
ह्याची बायको माणूसय की मशीन...किती फेकावं माणसानं...किती म्हणजे किती?
...आणि खरंच ती उलटून बोलत नसेल तर काय मग तिला सोशिकतेच्या नदीत बुडवून काढून मृत केलं असेल का?
रे भेंडी विसरलेच... त्याच्याच भाषेत बायको म्हणजे गु-ला-म! हे ऐकून शाणपट्टीच्या पायाखालची जमीन सर्रकन खिसकवून घ्यावी वाटणार नाही का?
चौदाशेच्या काळातून बाहेर न आलेला तो बुरसट विचारांचा अल्ट्रामॉडर्न शाणपट्टी दोन तास ही असलंच बाळवट खीटपीट करत होता.
अल्लाह के बाद अगर किसीको सज्दा करने का कहा गया तो वो है शोहर को, इतना दर्जा दिया है उसे... औरत का ओहदा मर्दसे कमही होता है... आदमी को हमेशा औरत के आगे रखा, उसका प्रोटेक्टर बनाकर... आदमी काम से थका भागा आता है तो बीवीने ही उसकी खिदमत करनी चाहीए...उसके पीछे दुनियाभर के टेन्शन रेहते उप्पर से बीवी तंग करेगी तो फिर क्या करेगा बिचारा मर्द... कितनी भी परेशानी हो बीवीने उफ नहीं करना चाहिए... मर्द जो चाहे कहे (करे) औरत ने उसके हद में रहना... बत्तमीजी और जबानदराजी नही करना (सहते रहना)उसके दिल जैसा रहना, उठ बोले तो उठने का बैठ बोले बैठने का... एक गुलाम के जैसा रहने का...
क्काय! बायको आणि गुलाम... बायको आणि गुलाम... बायको आणि गुलाम! वाजतच राहिलं कानात. कान बधीर होतील असं वाटलं क्षणभर. अंहं क्षणभर नाही, बराच वेळ. बराच वेळ कानात तेवढंच ऐकू येतंय... पुढचं काहीही ऐकू शकत नव्हते आता.
नवरा बायको. समसमान. एकमेकांना पुरक. एकमेकांचे साथी-सोबती, दोस्त. बरोबरीचे. त्याच्याच भाषेत सांगण्यासाठी एकदुसरे के लिबास, एक चुकेल दुसरा सांभाळेल. दुसर्याच्या सुखदुखात पहिलाही सोबती. कायदा-संविधान..! अशी काय बडबड केली होती मी. माझ्या तोंडात कॅसेट बसवल्यासारखं मी हेच हेच आणि तेवढंच बोलत होते कंटीन्यू. दोनतीन तास. इतक्यांदा सलग बोलून बोलून घशाला कोरड पडली होती, आपल्याच घशात आपला आवाज अडकणार की काय इतका. क्रोधापेक्षा करूणा हे डॉक्टर दाभोलकरांचं तत्वही आता हळूहळू फिक्कं पडू लागलं होतं.
त्यातच त्यानं बायकोच उलटून न बोलणं आणि गुलामाशी तुलना केल्यावर तर करूणा नष्टच झाली. क्रोध तर बेसुमार होता पण त्याही पुढं जाऊन हातापायांतलं त्राण नष्ट झालं. ह-त-ब-ल. हतबल वाटू लागलं. अस्सं झालं की मी कुठल्या भाषेत ह्याच्याशी बोलू. मुळात बोलून ऐकणार आहे का हा? ऐकू तरी येतं का? ऐकायचं माहितीये का? मी बोलण्याचा अवकाश की तो तिची ही चूक, तिची ती चूक, तिची ही चूक, तिची चूक हे त्याचं चूकपुराण संपतच नव्हतं. तो ऐकतच नव्हता म्हणजे. तो ऐकत नव्हता? घशाला कोरड पडली तरी तो ऐकत नव्हता?
मग... मग... मग दातओठखात मधलं बोट दाखवून सरळ मागं फिरले. आता तर त्याच्या अंगातच आलं. चवळताळला. घरभर थयथयाट. आक्रस्ताळेपणा. वर बोंबलणं. कचकचकचकच बोंबलणं. त्याच्यासमोर खूर्चीवर शांत बसून मी बाटलीतलं पाणी प्यायले. माझा खरंच रोजा नव्हता!
त्या तीन चार तासात तेवढंच एक बरोबर त्याला कळलं होतं. रे भेंडी त्याला ते कळलं होतं...त्याला ही भाषा कळते?! ठरलं याच भाषेत बोलायचं आता...सगळी कलकलच संपली की राव!

रविवार, ४ एप्रिल, २०२१

चेंज

 ‘मला उबग आलाय घर एके घर करून...’

‘घर एके घर? रोज ऑफिसला तुझं काय भूत जातं का? ’
‘हां राईट! पण मला हे रोज घर-ऑफिस-घर करून कंटाळा आलाय. आय नीड चेंज.’
‘रोजच्या रोज घराबाहेर तर पडतेस. आवडीचं काम करतेस. आता कसला चेंज हवाय? दर रविवारी फिरूनही येतो.’
‘सोसायटीच्या गेटच्या बाहेर पडणं म्हणजे फिरणं असतं का? बरं त्या फिरण्याचा उद्देश ही ठरलेला असणार... भाजी आणायची, दळण टाकायचंय, फळं हवीत, नाहीतर मुलांच्या समाधानासाठी जरा बागेत नेऊन आणायचंय. येताना एखादी कच्छी दाबेली, एखादी भेळ, एखादी पाणी-पुरी गेला बाजार सॅण्डवीच खाल्लं की फिरणं सफल, नाही का? घराबाहेर पडण्याच्या, फिरायला जाण्याच्या या कल्पनांचासुद्धा मला तिटकारा आलाय.’
‘ए, प्लीज पुन्हा सुरू करू नकोस. ’
‘मी काय सुरू केलं. मला काय वाटतं हे तुला सांगायचंही नाही का? मग मी बोलायचं तरी कुणाशी?’
‘बोलू नको म्हणतोय का तुला? पण इतकी मोकळीक देऊनही कटकट काही संपत नाही तुझी. तुझ्या फिरण्याबिरण्यावरही बंधनं घातली का कधी? जा ना कुठं जायचं तिकडं जा. फिर. मजा कर. झालं तर.’
ती उदास हसली. याउपर तिला प्रतिक्रिया देणंच जमणार नव्हतं. गॅलरीतल्या खूर्चीवर येऊन ती शांत बसली. उन्हाळ्यातला पिवळाधम्मक उजेड आकाशात चमचमत होता. गार वाराही सुटला होता. हे म्हणजे तिच्यासाठी सोने पे सुहागा.
कालच नव्याने आणलेल्या दोन फुलझाडांकडे तिनं प्रेमानं पाहिलं. बरं वाटलं तिला.
‘आपणच फुलवलेली गॅलरी एवढाच निसर्ग आपल्या वाट्याला. या फुलांचा, मातीचा सुवास घ्यायचा आणि कुठल्या तरी दूरवरच्या उपवनात असल्याचं मानून घ्यायचं. या नव्या फुलझाडींची नावं देखील ठाऊक नाहीत. बोट दाखवून निवडली. नर्सरीतल्या माळ्यानं सांगितलंही असतं पण म्हंटलं, असू दे, सगळंच काय माहीत करून घ्यायचंय. घर-ऑफिस विसरून, टाईमटेबलच्या बाहेर निघून, इथल्या इथंच निरूद्देश भटकून, मनाची पाटी कोरी करून घ्यायची. वर आणखी ट्रॅव्हलींगच्या खोट्या पावत्या दाखवून एलटीए एनकॅश करायचा. घराची कुठलीतरी सोय करून तेवढ्यातच आनंदून जायचं... आणि पायात चपला अडकवल्या की कुठं चाललीस या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कुणाला? तर मी जरा जाऊन येतो असं बेधडक म्हणणार्या माणसांना.. मस्त मोकीळीके आपल्याला...!’

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

स्वप्न!

आयुष्याची चाळीशी आलीये तिची. नोकरीचा एक टप्पा गाठून झालाय. घरसंसाराची घडी बसलीये. सारं काही आपपल्या जागी नीटनेटकं. पण काल ऑफिसमधल्या नवख्या पोरानं सहज म्हणून जे विचारलं तेव्हापासून तिला अस्वस्थता आलीय. अचानक खूप धडधड वाढली. आपली चोरी पकडल्यावर आता कुणीतरी भ्रष्टतेचा आरोप करेल तेव्हा जसं वाटेल तसंच तसंच काहीसं तिला वाटलं. प्रश्न खरं तर खूप साधा होता. ‘आयुष्यात जर तुम्हाला पुन्हा संधी मिळाली तर तुम्ही तुमचं कोणतं स्वप्न पूर्ण कराल?’

प्रश्न ऐकला आणि ती गरगरून चाट पडली..तिच्या एकदम लक्षात आलं की...
म्हणजे आयुष्यात आपण जे मिळवलंय ते आपणच मिळवलं असलं तरी ते आपल्याला मिळवायचंच होतं असं नाही. ते मिळाल्यानं सुखावून गेलो त्या त्या क्षणी तरी ते खरंतर आपलं स्वप्न नव्हतं. नोकरी हा उद्देश नव्हता. तो केवळ मार्ग होता मग ते ध्येय कधी झालं आणि स्वप्नं! रररशीत जगण्याचं आणि खुसखुशीत वाढण्याचं स्वप्न..ते कुठं गेलं..हे हे काय घडलंय..आपलं स्वप्नं मेलंय? तेही केव्हाच. ज्याचा अतापता आपल्याला नाही. त्याच्याकडून कुठला सांगावा धाडला गेला नाही कि जाब विचारला गेला नाही. प्रचंड संतापजनक आहे हे..आपलं स्वप्न कधी काळी जिवंत होतं आणि त्यासाठी आपण काहीही करू शकत होतो ही गोष्टच आता खूप खूप मागे पडलीये, पृथ्वीच्या कधी घडलं हे!
सगळी स्वप्नं पूर्ण होत नाहीत मान्य पण ज्या स्वप्नाची पूर्ती दुसर्या संधीत आपण सर्वात आधी करणार आहोत त्याच्या पूर्ततेची पहिली संधी हुकलीये? किती खोल आणि रिकामं रिकामं वाटतंय. जिवंतपणीच स्वप्नाचं आपल्या नकळत मृत्यू व्हावा या त्रासाइतकं भयाण काय असू शकेल. आजवरच्या सगळ्या खस्ता, कष्ट, राग-अपमान या सगळ्याचं मूल्यच शून्य झालंय. ते सगळं सोसूनही त्याची किंमत कवडीमोल झालीय कारण स्वप्न तर मरून गेलंय. हेहेहे असं नको व्हायला हवं होतं. स्वप्नानं साथ सोडून मरून जाऊन काळ लोटल्यावर त्यानं असं प्रश्न होऊन समोर यायला नको होतं. जगण्यातला सगळा प्राणच शोषून घेणाऱ्या या टोचण्या हव्यात कशाला पुन्हा पुन्हा. च्चा मारी! असं आयुष्याचा अर्धा पट उघडा पडल्यावर कुणी विचारू नये कुणाला अपूर्ण इच्छांविषयी आणि मृत स्वप्नाविषयी...बरं चाललेलं आयुष्य बरं उरत नाही मग नंतर आणि बरं चाललं होतं आधी या भोपळ्याशी सामनाही करवत नाही..!

रविवार, २४ जानेवारी, २०२१

पाऊसमयी

प्रिय, 

गधड्या

परवा तुला भेटण्याची खूप इच्छा झाली होती. भेटायचे नेमके कारण माझ्याकडेही नव्हते. पण भेटायचे नक्कीच होते. तसं तर मनात सांगण्यासारखे खूप काही होते. पण त्यातील काहीच ओठांवर आणायचे नाही, हे मी आधीच ठरवले होते. तुला फोन केला. भेटशील का विचारले आणि कधी नव्हे ते तू पहिल्याच झटक्यात ’हो’ म्हणालास. मग भेटण्याची वेळ ठरवली अणि ठिकाणही. अर्थात नेहमी प्रमाणे या दोन्ही गोष्टी तूच ठरवल्या. मी फक्त पोहचायचे काम करणार होते, तेही वेळेवर. मला जरादेखील उशीर झाला की तू आपला फुरंगटून बसतो. तुला वाट पाहायला आवडत नाही. मग मला जरासाही उशीर झाला की तुला कितीदा ही ’सॉरी’ म्हणून विनवलं, तरी तुझी संवादाची गाडी काही केल्या पुढेच जात नाही. खरंतर वाट पाहायला मला ही आवडत नाही. मला आजही लख्ख आठवतयं, आपण अगदी पहिल्यांदा भेटणार होतो त्याचवेळेस तुला बजावलं होतं, ’वेळेवरच ये.’ 

यावर मला म्हणाला होतास, ’बाईसाहेब इंतजार का भी अपना एक मजा होता है! ’

तुझ्या या वाक्यावरुन तू उशीर करणार हे ओळखून मी दहा मिनीटे उशीराच पोहचले होते तेव्हा. तरी पठ्ठ्या तू, काही पोहचलाच नव्हतास. पण मला विनाकारण उगीच उशीर करायची सवय नसल्याने जेव्हा पण भेटायचे ठरवले, बहुतेकदा तुझ्या आधीच पोहचले. मध्यंतरी एकदा कधी नव्हे ते, तो तू वेळेवर पोहचलास. खरतर वेळेवर नव्हे; माझ्याआधी पोहचलास तर सगळी भेट शांततामायीच्या अधीन होती. कारण ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला नव्हतास. तू मात्र प्रत्येकच वेळीस वाट पाहायला लावलीस आणि निङ्कूटपणे मी पाहिलीसुद्धा. वाट पाहायला अजिबात आवडत नसतानाही...का हे मात्र कळत नाहीये....!!

त्या दिवशीसुद्धा अशीच घाई झाली. रविवारचा दिवस आणि घरी काका-काकू, बच्चेकंपनी आलेली. त्यातच पुरणपोळीचा बेत आखलेला. तुला जेवणात नेमके काय आवडते ठाऊक नव्हते. तरीही तुझ्यासाठी पुरणपोळी घ्यायची ठरवली. सकाळची लगबग लक्षात घेऊन आणि तुझ्यासाठी वेळेवर पोहचता यावं यासाठी मनातल्या मनात ताळेबंद करुन, दुसऱ्या दिवशी घराबाहेर लवकर पडणार असल्याचे आईला रात्रीच सांगून टाकले. त्यामुळे तिने आणि काकूने पण सकाळपासूनच पुरणपोळीची तयारी सुरु केली होती. मग फटाफट तुझा आणि माझा डबा भरला. पुरणपोळीचा डबा असल्याने ऑफिसमध्ये मोजूनच कसे नेणार म्हणून मी दोन डबे घेत असावी, असा अंदाज आईने लावला असणार. म्हणूनच मग तिने मला काहीच विचारले नाही. मीसुद्धा काहीच बोलले नाही. अर्थात हा डबा तुला म्हणजे नेमका कोणाला देणार हे मी तरी कुठे सांगू शकणार होते. आवाराआवर केली, स्कुटी काढली.

वेळेवर पोहचण्याशी प्रामाणिक राहता यावे यासाठी सूसाट निघाले. ठरलेल्या ठिकाणी पोहचले. तू आलेला नव्हताच. पाच मिनिटे, दहा मिनिटे, 15 मिनिटे. तुझा काहीच पत्ता नाही. फोनही घेत नव्हता. विसाव्या मिनीटाला मी वैतागलेच तेवढ्यात तुझा फोन आला, अचानक महत्त्वाचं काम आलं त्यामुळे येता नाही येणार...यापुढेही तू काही काही बोलत होता. मला काहीच ऐकू येत नव्हते आणि माझं काहीही ऐकून घेण्याआधी तू फोन कट करुन मोकळा झालेला. तब्बल चार वेळा ‘भेटणं अशक्य’ या तुझ्या उत्तरानंतर ठरवलेला प्लॅनही तू सहज फिसकटलास. तुझ्या या फोननंतर एकदम भोवळचं आल्यासारखी झाली. तू येणार हे ठाऊक असल्याने रस्त्याच्या कडेला उभं राहण्यात काहीच वावगं वाटलं नव्हतं पण आता सगळ्या नजरा आपल्यालाच पाहतायेत आणि दात विचकवून हसतायेत की काय असं वाटू लागलं होत. तुझ्यावर प्रचंड राग येत होता आणि रागवताही येत नव्हते. विचित्र हतबलता होती. मनात असंतोष होता. गाडीची दिशा बदलवली. ऑफिसला पोहचले. सगळा दिवस तू उदासवाणा केला होतास पण याची तुला कल्पनाही नव्हती आणि मला ती तुला द्यावीशीही वाटली नाही. सगळं आलबेल असल्यासारखंच वागायचं मी ही खोटा प्रयत्न करत होते. तुझ्यासाठी घेतलेला डबा माझ्याकडे हिरमसून पाहत होता. त्यामुळे माझ्याही डब्याला मला हात लावावासं वाटलं नाही. ‘अचानक महत्त्वाचे काम आले’ या वाक्याभोवती मन घोळत राहिले. माझ्यापेक्षा महत्त्वाची काङ्के तुझ्या आयुष्यात निश्‍चितच असू शकतात. पण तू ते ज्या पद्धतीने सांगत होता त्यात कुठेच अपराधीभाव नव्हता की मला झालेल्या त्रासाची जाणिव नव्हती. संताप, संताप आणि प्रचंड संताप.

तुझ्यामुळे ऑफिसमध्येही मी पुर्णपणे नव्हते. ना धड कोणाशी नीट बोलत होते. तुझा राग कोणावरही निघत होता अगदी स्वत:वरही. मग सरळ लेडीज रुमच्या बेसीनपाशी गेले. चेहऱ्यावर पाणी मारले. पाण्याचा मार बसल्याची जाणिव झाली. मग नुसतेच बेसीनच्या नळा खाली हात धरुन उभी राहिले. ‘पाणी वाया घालवू नका’ची समोरची पाटी दिसली तसा नळ झटकन बंद केला. दीर्घ श्‍वास घेतला. एक, दोन, तीन. जरा रिलॅक्स वाटलं. मनावरची मळभ बेसीनच्या पाईपमधून बाहेर गेल्यासारखी वाटली. खूप छान ङ्खील होत असल्याची जाणिव स्वत:ला मुद्दामच करुन दिली. बाहेर आले. पुढचा सगळा वेळ कामात झोकून दिले. काम करण्यात वेळ गेल्याचेही लक्षात आले नाही. सकाळचा प्रसंग आणि त्याविषयीचा रागही निवळला होता. रात्रीचे साडे नऊ वाजता साईन आऊट केले. वहीत निघतानाची सही केली.

स्कुटीपाशी पोहचले. डिक्की उघडली. दोन्ही डबे पुन्हा त्यात ठेवून टाकले. 

आकाशाचा काळा रंग अधिकच गहिरा झाला होता. नभ दाटून आले होते. थेंब-थेंब पडायला सुरुवात झाली होती. गारेगार वारा वाहू लागला होता. डोक्याला ओढणी बांधावी म्हणून गळ्यातील ओढणी काढणार इतक्यात ती एका बाजूने ओढल्यासारखी वाटली. मी मागे वळणार तर तूच एकदम समोर उभा राहिलास. म्हणाला, ‘निघालीस?’ आता हा प्रश्‍न होता की ‘थांब ना’ अशी सूचना. प्रश्‍नातील लडिवाळ सूचना तुला फार छान जमते. मलाही काहीच सुचले नाही. माझ्या ओढणीचे एक टोक अजूनही तुझ्या हातात होते. ‘चल, ब्रिजवर जाऊयात. कायम म्हणत असतेस ना, ब्रिजवर बसून गप्पा मारायच्यात. चल जाऊयात आत्ता..’ शब्दच फुटत नव्हते मला. तसं तू हातातील ओढणीचे टोक ओढलेस. म्हणाला, ’पार्किंगमध्येच असू दे तुझी गाडी आणि रेनकोट वगैरेसुद्धा. हां फक्त मघाशी दोन भरलेले डबे डिक्कीत जाताना बघितलेत मी. तेवढे घे आणि माझ्या गाडीवर बस. आज घरी देखील मीच सोडणार. सूचना आणि धमकी तुला एकाच वेळेस साधता येते. मी भारावल्यासारखे, तू सांगेल ते करत गेले. ब्रिजवर पोहचलो. गाडी तिरकी करुन लावलीस. गाडीला रेलून फुटपाथवर बसलो. डबे उघडले. थेंब-थेंब पावसात ओल्या ओल्या पुरणपोळीची लज्जतच निराळी झाली होती. इतक्यात पावासाने जोर धरला. तुफान कोसळायला लागला. क्षणात तू ओलाचिंब झालास अन् तुझी नजर सांगत होती की मीही...!!! हात फैलावून चेहर्‍यावर पाऊस झेलू लागलास.’ या पावसाची मी कित्ती वाट पाहत होतो, तुला कल्पना नाही, पाऊस मला खूप आवडतो आणि पावसात...’’पुढे बोललाच नाहीस.

पाऊस झेलत राहिला..चिंब झाला होता तरी भिजायचं होतं तुला. तुझ्या खडूस वाटणार्‍या इमेजला तुच तडा देत चालला होतास. निराळाच तू, आज नव्याने दिसत होतास. तुझ्याकडे पाहण्यात मी इतकी व्यग्र झाले होते की तू हात धरुन कधी आपल्यातील अंतर कमी केले कळलेच नाही. हे लक्षात येऊन मागे सरकायच्या आत तू माझा हातं खेचून अंतर अधिकच कमी केले अन् म्हणाला, ‘‘तुझा आवडता ब्रीज आणि माझा आवडता पाऊस या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूपच झक्कास आहे. दरवर्षीच्या पावसात तुझ्या या ब्रीजवरच्या आनंदात मला वाटेकरी करशील....!!!’’ ओठांवर नकळतपणे उमटलेली स्मितरेखा इतकंच उत्तर होतं माझ्याकडे. पुढे काही बोलायची आता जरुरच उरली नव्हती. तुझ्या हातात माझा हात तसाच होता. प्रेमाची पहिली कबुली अन् पहिला पाऊस हेही कॉम्बिनेशन झक्कासचं तर होतं. माझ्यासाठी सगळं स्वप्नवत होतं. खूप वेळ आपण मनसोक्त भिजलो. तुझ्या आवडत्या पावसावर मला ही प्रेम वाटायला लागलं होतं...ठरल्याप्रमाणे तू घरी सोडवायला आला...गाडीवरुन उतरल्यावर तू पुन्हा हात खेचून थांबवलसं. तूही गाडीवरुन उतरला. माझ्या कपाळावर ओठ टेकवले आणि तसाच कानाशी सरकला एका दमात श्‍वासही न घेता म्हणाला, ’’तुझं आत्ताचं पाऊसमयी होणं, एकदम भन्नाट आहे, पण त्याहीपेक्षा सकाळी माझी वाट पाहताना अगतिक झालेल्या तुझ्या चेहजयावरची लाली, तुला जास्त सुट करते डिअर.. जीवाला अगदी वेड लावते...!!! मी एकदम आश्‍चर्याने पाहू लागले. तर तू झटदिशी बाईकला किक मारली आणि पुढे जाऊन मोठ्याने ’’सॉऽऽऽऽऽऽरी, उद्या घ्यायला येतो ग’’ म्हणत पुढच्या गल्लीत दिसेनासा झाला..!

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

स्वत:पुरतं विषय संपवून टाकला.

सख्या,
मागे तूच कधीतरी म्हटलेलंस...
अर्धवट सुटलेले,
अबोल राहून गेलेले,
ना कळलेले-आकळलेले,
अव्यक्त-अर्धबोल,
अस्पर्शीत राहिलेले, धसमुसळ्या स्पर्शाने स्पर्शाची अभिलाषा निर्माण करणारे पण ती अपूर्णच राहिलेले,
आधीची ओढ अपूर्णतेने अधिक वाढवणारे,
पूर्णतेचा ध्यास देणारे किंवा त्याची गरज नाही हे सांगणारे,
अपूर्णतेतही मौज आणणारे किंवा दु:ख देऊन मनाला आनंद देणारे असे क्षण मला फार आवडतात.’
सख्या, तू सांगितलं तेव्हा त्या शब्दांचा अर्थ उलगडला नव्हता आणि आत्ता ते सारं अनुभवल्यासारखं वाटतंय. अपूर्णतेत खूपच मौज आहे. हाताशी काहीतरी आल्यानंतर हातातून पुन्हा ते अलवार निसटून देण्यातसुद्धा एक कैफ आहेे. म्हणजे पहा हं, केवळ तू सांगितलं म्हणून मी नाईंनटी सिक्स (’96) नावाचा तमिळ चित्रपट पाहिला. दहावीच्या वर्गात शिकणारे दोन जीव एकमेकांत गुंतूंन जातात, प्रेमाची कबूली न देता! त्यानंतर मध्ये बरंच पाणी वाहून जातं. दोघांची ताटातूट होते आणि 1996 साली शाळेतून पास झालेल्या बॅचचं गेटटुगेदर ठरतं. इथंच मग तरुण नायक नायिका एकमेकांना पुन्हा भेटतात. प्रेमाची परिणिती सहजीवनात झाली नाही तरीही दोघांच्या ही हृदयाशी शाळेतलं प्रेम उरुन पुरुन राहिलं आहे. त्यांच्या केवळ हालचाली, हावभावांतून प्रेम पाझरत राहतं, इतकं की आपलंही मन सुखावून-दुखावून जातं.
मला हा चित्रपट फार आवडला. पूर्ण अपूर्णतेच्या मधल्या हिंदोळ्यांवर झुलत राहिलेलं त्यांच्यातलं अलवार नातं मनाला फार आवडून गेलं.
आणि मग थोड्यावेळानं का कुणास ठाऊक मनाला टोचणी लागू लागली. हृदय की काय दुखायला लागलं. म्हणजे जामच कसंतरी व्हायला लागलं. पोटातही, मनातही, डोक्यातही. विचित्र-विचित्र. कामधाम नसल्यासारखं मी उगाच खूप वेळ विचार करत राहिले, मी अशी कुणाच्या प्रेमात पडले नाही का? आपण प्रेमात आहोत हेही कळू नये इतका जास्त जीव कुणामध्ये गुंतला तरी आहे का? आयुष्यात भले आज ती व्यक्ती माझ्यासोबत नसेल, पण त्याच्या नसण्याची रुखरुख देणारा किंवा अगदी आपल्यातून तो कधी उणा झालाच नाही असं वाटायला लावणारा आहे का कुणीतरी? हातातल्या रिंगशी खेळत खूप विचार केला. खूप म्हणजे खूपच जास्त. पण यासंदर्भानं कुणीच असं आठवेना. आपला जीव कुणाच्या तरी जीवात अजूनही थोडाफार गुंतून पडलाय असा कुणीही व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही!
माझं आयुष्य इतकं सरधोपट, इतकं सपक, इतकं चारचौघींसारखं आहे? माझं सरळ लग्नच व्हावं... श्शीट यार! किती बोअर. कुठल्याही एक्सायटमेंट, चार्मशिवाय लग्न झालं. होणार्या नवर्याशीच का होईना पण चोरुन-बिरुन भेटण्याची, लपाछपी करत काही मोमेंटस मिळवण्याची, आयुष्यात रंग भरण्याची काही गंमतच केली नाही. आणि आता लग्न होऊन ही त्यात...फरगेट इट. मी एक भली मोठी जांभई दिली.
खरंतर आयुष्यात एखादा असा पुरुष ज्याच्याविषयी कायच्या काय वाटतंय अगदी इन्फिनीटीच्या टर्मसमध्ये कायच्या काय वाटतंय असं कुणीच नाही याची खंत वाटायला हवी होती. म्हणजे मला वाटतच होती. पण त्यानं काय होणार होतं, माती तर खाऊन झाली होती. पुरुषांना स्त्री हवी असते तसं स्त्रीलादेखील पुरुष हवाच असतो की.. उलट मला तर प्रश्नच पडला, शाळा तर जाऊ दे पण कॉलेजात, विद्यापीठात किंवा नोकरीच्या पहिल्या वहिल्या वर्षांत मी कुठं होते? लोकं चार-चार अफेअर करतात आणि मग रीतसर लग्नही. हो ना, तेही नव्याच माणसाशी आणि मी? प्रेमात बुडून जावा असा एखादाही पुरुष आपल्याला आयुष्यात न लाभावा? मला स्वत:चंच फार वाईट वाटत राहिलं. पण त्या वाईट वाटून घेण्याचं तरी मी काय करणार होते? किती वेळ त्या विचारात गढून जाणार होते? स्वत:पुरतं विषय संपवून टाकला. तसाही विषय स्वत:पुरताच होता.

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

संतत्व?

 ...मी इथं मन मारत राहते. माझ्या आशा-आकांक्षाना सतत मुरड घालत राहते. कित्येक इच्छा अशा उधळून लावते जणू त्या माझ्या नव्हेतच. आणि तू बिनधास्त उधळपट्टी कर. फिजूलखर्ची कर. गरजा न ओळखता पाय पसरत रहा. आणि मी मनाची चाळणी करून घेते. कुठलीच आस-आसक्ती राहायला नको ना...किमत नाही तुला माझी...

काहीही बोलू नको. कुठलाच फालतू खर्च करत नाही. आणि तुला तर काही कमी पडू देत नाही.. तुझ्या सगळ्या इच्छा-आशा-अरमाँ पुऱ्या करतो. सारखंच काय आपलं मन मारते न त्याग करते न मोठेपणा करते न मीच रडूबाई-पडूबाई होऊन जगते. त्यानं ही तिच्या आवेगाहून आवाज चढवला.
हो हो मोठा आलास माझी किंमत ओळखणारा! नाहीच तुला माझी किमत..अन काय केलंस ते इतकं बोलून दाखवतोयस. तुला काय माहित मी माझ्या कित्येक हौशी सोडून दिल्या. आता नको नंतर बघू म्हणून सोडून दिलं. पैपै जपण्यासाठी, राखण्यासाठी कुठली मौज केली नाही कि मनासारखा खर्च..
कसली हौस-मौज? काय कमीये तुला. सगळं वेळच्या वेळी देत आलोय तरी तुझं तुणतुणं सुरूच. नाही एकदाच सांगच काय राहिलंय..तुझी कोणती इच्छा-आकांक्षा मारून
माझ्यावर उपकार केलेस..हा सांग..कुठली मौज..बोल ना..
हां तेच ते. बोलता बोलता ती जरा अडखळली. तिला पटकन काय उत्तर द्यावं सुचेना झालं. हमम अ-स ए-क-द-म आ-ठ-व-त नाही..म्हणजे काही नाहीच असं नाही. आवाज पुन्हा किंचित चढला
तो जोर जोरात हसू लागला. म्हणाला, काही असेल तर आठवेल ना.. थोडी तंगी आहे मान्य. तुला जरा बेअर करावं लागतं. क्रेडिट डेबिटवर जग चालतं.. पण तू मागितलं नाही तरी तुझी सगळी हौस ना मी भागवतो, मी.. काय पाहिजे ते आणून देतो कळलं का? तरी तुझं... साला घरी थांबूच नये..नुसती कटकट. जगणं अवघड होऊन बसलंय..असं म्हणत दार जोरात आपटत तो बाहेर पडला.
***
ती स्वतःवर जोराची चिडली. मला एक हौस सांगता आली नाही. लानत है.
स्साला इच्छा मारली..इच्छा दाबली म्हणता म्हणता त्या खरंच मरून गेल्या..कधी? खरोखर एक ही आशा अपेक्षा माझ्याकडे आता उरली नाही का? रंगबेरंगी आकांक्षांचा फुगा माझ्या हातून कधीचाच निसटून गेलाय का? तो पुरवत असेल ही पण ते सारं मला हवं आहे का? मग मला म्हणून हवं असण्याची उर्मीच नष्ट झालीये का? एक-एक-एक इच्छा सांगता नाही आली... एक-एक-एक मौज... असं कसं? एक तरी मुरड घातलेली इच्छा आठवायलाच हवी..की खरंच नाही हौसमौज उरलेली काही. आपण संतत्व गाठलं की काही गाठणंच नकोसंय..
आतली सिस्टम इतकी पोकळ होत चाललीये? कधी..केव्हापासून मी इतकी रिकामी होत गेले..त्याचा तरी काही थांग लागणार आहे की मनाबरोबर मेंदूलाही चाळणी लागली आहे...!! ऑऽऽह थिस फिलिंग इज सो हॉरिबल..

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...