गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

पिक्चर


पिक्चर पाहून आल्यानंतर आल्या आल्या मला म्हणाला होता, पिक्चर पाहताना पुर्णवेळ मला तुझी आठवण येत होती. सांग कधी नेतेस परत? तुझ्याबरोबर पहायचाय?
मग आधी का गेलास सोडून..झालं ना पाहून तुझं? माझी मी जाईन आता.मीही उडवून लावलं.
तू (खट्याळपणे)- बरं, तू कधी जाणार तेवढं सांग? मी येईल.
माझ्याकडून दोन चार फटके.
मी-काय स्टोरी आहे. एवढं काय होतं त्यात माझी आठवण यायला?
तू- तू बघ कळेल तुलाही. कोणास ठाऊक तुलासुद्धा मी आठवेल.
मी- हाहा...माझं ठरवू नंतर. तू पाहिलसं ना आत्ता. तू सांग.
तू- अम्ममम...यार! म्हणजे कसं सांगू आता..एक्झॅक्टली नाही गं सांगता येणार. असं सगळंच नेमकं कुठं स्पष्ट करता येतं? बस्स वेगवेगळ्या फ्रेम्समधून तू आठवत राहिली. तू, तुझी मैत्री, तुझा सहवास, तुझं असणं, तुझं हसणं आणि रडणंही. सगळंच एकमेकांत गुंतून, एकापाठोपाठ. अमूर्तपणे.
मी- ओह रियली (अविश्‍वासाचा सूर)
तू- केवढा अविश्‍वास..जाऊ दे हे गाणं ऐक. मला खूप आवडलं, मी लगेच डाऊनलोड केलं.
माझ्या कानात हेडफोनचं एक टोकं अडकवून दुसरं स्वत:च्या कानात घुसवलंस आणि गाण्याच्या प्रत्येक शब्दासह माझ्या चेहर्यावरच्या एक्सप्रेशनला निरखून पाहत राहिलास...
:
:
:
तेच गाणं आत्ता ऐकतेय मी. तुझ्यासोबत गाणं ऐकताना तेव्हा जे जे वाटत गेलं ते तसंच आत्ता परत वाटतंय. अजूनही तसंच सेम वाटतंय. तीच गंमत, तीच हुरहूर. याला नेमकं काय म्हणायचं रे. तुला आवडलं म्हणून मलाही गाणं आवडलं होतं. आत्ता ऐकतो की नाही तू हे गाणं? हे गाणं डाऊनलोड केलेला मोबाईल कुठाय? अन हेडफोन? गाणं ऐकताना आता वाटतं का तसंच पूर्वीसारखं? ते सगळं जाऊ दे रे पण तू मुळी आहेस तरी कुठं ? घड्याळ्याच्या काट्यात? कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये? माऊसच्या पॅडखाली? प्रोजेक्ट फाईलींच्या पानांत? कुठं आहेस कुठं तू?
हे काय? तुझं आवडीचं प्रेमगीत असून मला इतकं दु:ख का होतंय? माझ्या आतही त्या फिलिंग्ज आहेत का रे? मग इतके दिवसं मी कुठं होते?
एरव्ही मला जराही आवडली नसती अशी तद्दन फिल्मी लव्हस्टोरी आज मला तुझ्यासोबत पाहायचीयं...तुझ्याशेजारी बसून...अंह खेटून. पिक्चर डाऊनलोडींगला लावलाय...आज जरा लवकर ये. मी विचार करतेय, पिक्चरचा. तुझा.
पण तू कुठं आहेस?
म्हणजे तुला तरी ठाऊक आहे का तू आत्ता कुठं आहेस?


बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

सुटका


तो तिच्या केसांशी खेळत लाडिकपणे म्हणाला, ‘‘तू सी ना जाओ ना! ’’
‘‘काय रे हा फालतूपणा...सकाळपासून तू हे कितव्यांदा म्हणतोय हे आता, मोजण्यापलिकडं गेलंय. म्च्म्च्...केसांमध्ये गुंता होईल रे, सोड केस आणि पॅकिंगला मदत कर.’’ ती पॅकिंगची यादी करायला लागली.
हाऊ मिन यु आर. मी काय केसात गुंता करतोय? मी इतकं रोमॅटिकपणे तुझ्याशी बोलतोय ते दिसत नाही. तुला काय तर पॅकिंगचं पडलंय...मला जाम टेन्शन आलंय ते तुला कळत नाही...खडूस कुठली. तू आत्तापासूनच परदेशात असल्यासारखी वागतेय.तो रागवून खिडकीपाशी गेला..
ओके...चिल.... सॉरी. मला सगळं कळतंय पण तू असं बोलून बोलून माझा पण इमोशनल लोचा नको ना करू... तुला खरंच वाटतंय मी जाऊ नये.
हो. अख्खा एक वर्ष तू नसशील, कसं जा म्हणायचं मी. नको ना जाऊ.....! बऽऽरं, असं नको बघू. जा, दिल्या घरी सुखी रहा....काय राव गंमत पण नाही करायची का? लगेच एक्सप्रेशन चेंज करतेस. जा..जा..जा परत म्हणशील तुझ्या करिअरच्या मध्ये आलो. म्हणजे तसं पण नाही. तू खरंच खूप मेहनत केलीस प्रोजेक्ट हेड होण्यासाठी...आय नो इट्स युवर ड्रीम. पण. बट टेल मी, विल यू मिस मी?’’
‘‘ऑफकोर्स! आय विल... आय विल मिस यू.’’
‘‘अन् मला नाही विचारणार, मी मिस करेल का म्हणून.’’
मला माहितीये ना, तू मिस करशीलचं. आत्ताच बघ कसं तोंड झालंय.तिनं त्याचा चेहरा आरशाकडे वळवलं.
‘‘हां. काही पण हा. मी काही मिस नाही करणार. मी तर ना दुसरी मुलगी पटवणार. ’’
‘‘बऽऽऽऽरंती मुद्दाम बरं वर जोर देत म्हणाली.
‘‘बऽऽऽरं..इतका अविश्‍वास! मी तर पटवणारच...तूच सांग तुला काय आवडेल..मीहून तुझी जागा कोणाला दिलेली की, कोणीतरी तुझी जागा पटकावलेली.’’
तिनं चिडून त्याला दोन गुद्दे  मारले मग शांत बसली.
तो हसत पुन्हा म्हणाला, ‘‘सांग की..काय तुला आवडेल किंवा असं म्हण कशाने तुला त्रास होईल.’’
तशी ती हसायला लागली.. ‘‘त्रास? काही पण...मला कशाला त्रास होईल,  का होईल! हां त्रास होईल कदाचित मला. ज्यात त्रास होणार आहे त्यात आवडण्याचं काही उरत नाही. राईट?’’
तो- ‘‘ओऽऽके.. तर तुला त्रास होणार आहे. इंटरेस्टिंग. पण माझ्या प्रश्‍नाला बगल देऊ नकोस. सांग ना, झाली तर तुझी जागा कशी रिप्लेस होईल असं तुला वाटतंय, सांग की.’’ तो तिला चिडवत राहिला.
तिनं पुन्हा दोन चार फटके लगावले. मग एकदम प्रश्‍नच उडवून देण्याच्या आर्विभावात म्हणाली-‘‘अशी कोणाची कोणाच्या आयुष्यात जागा बिगा काही नसते रे. ’’
तो- ‘‘रियली?’’
ती- ‘‘ऐसी कोई जगह नहीं होती और ना कभी रिप्लेस, ओके? नो, आय ऍम सिरीयस. हां कोणाच्या जाण्यानं काही काळापुरतं रितेपण येतं. खूप खोल रितेपण, ज्यामुळे सतत काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं. पण मग अलवारपणे कोणीतरी नवं आयुष्यात येतं किंवा जुनेच नव्याने भेटतात. आयुष्याची गाडी त्या प्रवाशासोबतही आनंदानं सुरू राहते. पण नवी व्यक्ती जून्याच्या जागेला धक्काही देऊ शकत नसते. कारण मुळात अशी जागाच नसते. असतं ते रितेपण. सुरुवातीला खूप काळ तीव्र वेदना देणार्‍या या रितेपणाची डेप्थ हळूहळू कमी होत जातेही पण तरीही रितेपण कायम राहतं.
तर माझ्या लाडक्या मित्रा...सांगायचं तात्पर्य इतकंच, मी तुला सोडून गेले तरी तुझ्या आयुष्यातील माझ्या रितेपणाच्या पोकळीसह मी कायम तुझ्यासोबतच आहे.’’
‘‘अरेरे...म्हणजे या जन्मात तरी काही सुटका नाही!’’


बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

आय जस्ट हेट यू..

मला तुझा जाम राग येतो, पण तुला ते कळतंच नाही.
मला तू जाम आवडतोस, पण तुला ते वळतंच नाही.
मी इकडून आनंदानं ‘हाय’ करते. तू तिकडून चक्क ‘बाय’ करतोस.
मी इकडून ‘हॅलो’ म्हणते. तू तिकडून ‘अच्छा चलो’ म्हणतोस.
मी तुझ्याशी बोलताना तुझाच तुझाच विचार करतेय...न् तू कुठल्या कुठल्या विचारांवर ब्ला ब्ला सांगतोयंस...
मला काय संवादणं महत्त्वाचं, मी बाळवटासारखं ऐकतेय..
तुला काय पाजळणं महत्त्वाचं, तू...तू वटवटतोयस.

एकदा मी किती उत्साहानं म्हटलं,
‘आज काय? एकदम झक्कास’
तो - ‘किती फिल्मी भंकऽऽस’
हे असंच असं कित्येकदा
मग माझ्या पण डोक्याला शॉट लागला.
चिडून, त्रासून, फुरंगटून, कंटाळून, वैतागून, ओरडूनंच म्हटलं,
‘बंद कर बकवास यार! जस्ट फील लाईक ह्युमन, यार’
‘अच्छा, फिर तू देदे ना थोडा थोडा प्यार यार!’
मी हाताची घडी, बोटावर तोंड ठेवून अवाक्
आय मीन तोंडावर बोट!
‘आता बघ, सोबत चालायंच तू ठरवलंच आहेस,
‘मैं किस खेत की मुली’ त्यात काडी करणार’
वर बोलताना, डोळा मारणारा खट्याळ स्वर..!
आँई! ये क्या हुआ
मी मोठे मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते.
तो छोटे छोटे डोळे करून आरपार पाहतोय.
नजरेला नजर...कुछ कुछ हुआ भीतर
शर्म हया...लाजबिज काहीबाही वाटतं राहिलं.
खरं खोटं काळजालाचं कळत राहिलं.
मग गारेगार हात त्याचा, वेटाळून माझ्या खांद्यावर
‘....सो आय अॅम सो फुल..तुला सारं कळत होतं.’
‘मस्का मारनेवाली हंसी’ तो ओठांवर घेऊन,
‘और...बच्ची है तू अभी, तुला काऽऽऽही वळतंच नव्हतं.’
‘आय...आय जस्ट हेट यू..’
‘याह! मी टू.’

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

पैंजण


काल ऑफिस सुटल्यावर पायर्‍या उतरत असताना, मागून एक मुलगी धाडधाड खाली उतरत गेली. तिच्यासोबत पायातल्या पैंजणाचा सौम्य नादही छुमछुमत गेला तसा तू आठवलास. पैंजण म्हणजे माझ्यासाठी पायातील एक दागिना. मी तर पैंजणांचा होणारा छुम छूम आवाज ऐकण्यासाठीच पैंजणं घालायचे पण तुझं नेहमीसारखं काहीतरी निराळचं असायचं. म्हणायचास...
‘‘कुणाच्याही पायातली पैंजणं धावू लागली; की मला सतत वाटतं, आनंद वाटायला निघालेत. कदाचित एखादं मोकळं आकाश शोधायलाही निघाली असतील नाही तर मोकळ्या आकशातील एक गिरकी घेऊन नुकतीच जमिनीवर स्थिरावयला पोहचली असतील.’’ कधी कधी यापुढे जाऊन माझ्या पायांकडे लक्ष रोखत म्हणाचास, ‘‘आणि तुझ्या पायातले पैंजण ते तर इतके सुरेख आहेत की नुसतंच पाहत रहावसं वाटतं. जणू तू पैंजण नाही तर छोट्या छोट्या चंद्राची माळच पायात ल्यायलीस. खरचं खूप सुंदर आहेत, तुझे पैंजण. हलकं हलकं वेड लावतात. तुला एक गंमत सांगू, जनरली कुणी कुणाचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर त्या व्यक्तीचा चेहरा येतो. पण तुझं नाव घेतलं की माझ्या डोळ्यांसमोर तुझे पैंजण येतात. तू स्वत: सोबत मधूर नादच नव्हे; तर प्रकाश घेऊन फिरतेस. जाशील ती वाट उजळवशील.’’
मी तर तुझीच वाट धरणारेयं.मी उत्साहाने म्हणायचे.
तूही विचार केल्यासारखा आविर्भाव आणत म्हणायचास.
हम्म्म...ठीकेय. एक ट्राय तो बनता है...
........
घरी आल्यावर वेड्यासारखी ते पैंजण शोधू लागले. सीडी-पुस्तकांचे कप्पे, पत्रांचा बॉक्स, कपाटातले कपाट,  छुप्या जागा असं सगळीकडे शोध शोध शोधले. इतक्या शोधशोधीनंतर पैंजण तर सापडली पण अजून तुझी वाट शोधतेच आहे.

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

The end-शेवट


तो- इतक्यात तू अशी बदलशील असं वाटलं नव्हतं आणि असंही वाटलं नव्हतं की, मला विसरायचा प्रयत्न एवढ्या तातडीनं सुरू करशील. कुणालाही विसरणं तुला इतकं सोप्पं वाटतं. कुणाचंही जाऊ दे, माझं बोलू. बोल ना, मला विसरणं जमेल? किती सहज तू हे विसरणं बिसरणं बोलतेयस. खरं सांग, माझ्या आठवणींच इतकं ओझं वाटू लागलयं तुला?
तिने एक आवंढा गिळला. डोळे घट्ट मिटून घेतले आणि न बोलता तशीच स्तब्ध बसून राहिली.
तो- माझ्या आठवणींचं ओझं वाटू लागलयं. ओझ! एकत्रितपणे आपण घालवलेल्या अनेक सुखद क्षणांना तुझ्या लेखी अर्थ तरी काय? ओझं! किती जीवघेणा शब्द आहे हा. म्हणे आठवणीची ओझी, असं कधीतरी होतं का?
ती उद्वेगाने किंचाळली.- होतात. आठवणींचं ओझचं नाही, तर मानेवरचं जोखड ही होतं. तुझ्या आठवणीचं असंच जोखड माझ्या मानेवर बसलयं आणि आता मला ते नकोयं. या आठवणींपायीच सुखाने ना माझा दिवस उजाडतो न रात्र संपते. एकांतात, गर्दीत कुठेही, कधीही मनात आठवणी पिंगा घालू लागतात, तू दिसू लागतो, मला सगळं ठाऊक असतानाही, मी तुझ्या दिसण्याच्या दिशेने जाऊ लागते न हाती काय येतं, निव्वळ भासाचा बुडबुडा. मग जाणवत राहतं तुझं सोबत नसणं. त्रास होतो याचा. तुला कळतयं का, त्रा-स होतो.
तो कुत्सित हसला.- मग किती पुसशील आठवणी. किती डिलीट करशील मेमरी. ओह सॉरी; ओझचं म्हणतेस तर मेंदूची सफाई झाली असेल ना, मग सांग किती केलीसं. किती वजावट अन किती बाकी. भरून आलेल्या जखमांचेही व्रण राहतात मग खोटेपणानेच ओरबाडून, फेकून दिलेल्या आठवणींचे व्रण नाही राहणार? ते तर तुझ्या डोळ्यांत आत्ताही दिसतायेत.
ती निर्विकारपणे त्याच्याकडे बघत राहिली- पुरे झालं. मला बोलूनही पुन्हा त्रास करून घ्यायचा नाहीये.
तो पुन्हा कुत्सित हसला.-तर..तू ही त्या सगळ्यांसारखी उरफट्या काळजाचीच निघालीस. तू जगाची रीत पाळायची नाहीस अशी खात्री होती.
ती झटकन उत्तरली- अन मलाही खात्री होती, तू असा सोडून नाही जायचा....पण गेलास ना. जाताना ना भेटला ना बोलला. तुझी मर्जी, तू चालता झाला मग तुझी मर्जी तू आठवणी पाठवू लागला. सगळचं कसं तुझ्या मर्जीनं होईल.
तो तिच्या बोलण्याला उडवून लावणारं हसला. निष्ठूर, निर्दयी स्मित त्याच्या ओठावर पसरलेलं. जणू त्याची काही चूकच नाही.
ती- काय खिजवायचं अन हसायचं ते हस. पाठीत खूपसलेल्या सुर्याची छातीत उमटलेली कळ तुला कधीच कळायची नाही. नाहीतर असा दगाफटका केलाच नसता.
तो- किती, किती किती गैरसमज करून घेशील. झालेल्या चूकीसाठी किती दोष देशील. त्रास काय मला होत नाही. तुझ्यापेक्षा जास्त होतो. तुला किमान बोट दाखवायला मी तरी आहे. मी स्वत:कडेच बोटं केल्यावर किती यातना होत असतील. तू समजून घेशील म्हणून आलो.
ती- आता शक्य नाही समजून घेणं वगैरे. आय ऍम फेडअप ऑफ ऑल धीस. येस...मे बी आय कॅन नॉट फरगेट यू बट शुअरली आय कान्ट फरगिव्ह यू. आलास तसाच माघारी फिर.
तो दुखावला पण मागे फिरला आणि तिने खाडकन मनाचे दरवाजे लावून घेतले. 

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

अस्वस्थ करणारं पुस्तक


प्रेम ही खरं तर किती तरल भावना आहे. त्याची व्याख्या करणं तसं अवघडचं शिवाय व्यक्तीसापेक्ष ही. पण एखाद्याविषयीची ओढ, प्रेमाची भावना आपल्याला सुखी, आनंदी, छान काहीतरी वाटू देत राहते, हे असचं असतं असंही नाही त्यात राग, लोभ, रूसवा फुगवा वगैरे कालांतराने मिसळत जातात हे ही खरं, यात कोणाचं दुमत असणार नाही. पण प्रेम करणं हे काही सोप्पं काम नाहीये. प्रेम करायला आणि मग ते पुन्हा आपल्या मनाशी मान्य करायला तुमच्यात हिम्मत असायला लागते. त्या पुढे जाऊन तुम्ही प्रेमाच्या पाठीशीचं उभं रहायचं ठरवत असाल तर तुम्हाला सगळी जिगरच पणाला लावावी लागते.
पण काही वेळा प्रेम करून ही, हिम्मत गोळा करता येत नाही. रूढीबाज जगणं इतकं अंगवळणी पडेललं असतं की, त्या ठरलेल्या आखीव-रेखीव चौकटीच्या बाहेर पाऊल टाकवलं जात नाही. पुन्हा पुन्हा रूढी-परंपरांच्या, नियम निकषांच्या रेषांवर आपण खेळत राहतो. एखादा नियम मोडण्यापेक्षा मन मारणं सोप्पं वाटतं. पण हे तितकसं सोप्प असतं का? मन मारताना होणार्या असह्य वेदनांपेक्षा मनाला घेरून टाकणारी उदासीची काळी छाया आणि अथांग अस्वस्थता त्याचं काय करायचं? कसं डील करायचं?
चिमुटभर रूढीबाज आभाळ ही राजन खान यांची कांदबरी अशीच अस्वस्थता निर्माण करणारी आहे. आपल्या जगण्याची एकूण व्याप्ती पाहता या रूढी परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा किंबहूना तो तेवढाच असतो पण तो आपण कुरवाळत राहतो आणि आपलंचं जगणं आभाळाएवढं मुश्किल करून घेतो. हा सगळ्यांच्याच जगण्याचा सार म्हणजे ही कादंबरी.
एकूणच, आपल्या समाजाची जडणघडण बर्या वाईट परंपरांच्या, जातीपातीच्या, उच्च-नीचतेच्या तथाकथित संकल्पनेच्या पोटातूनच होत जाते आणि कळत नकळत त्याचे संस्कार घेत पिढ्या दर पिढ्या घडत असतात. त्यामुळे पिढ्या दर पिढ्या प्रेम, संसार आणि प्रेमाचे दुश्मन वगैरे साग्रसंगीत घडतच जातात. त्या अर्थी आपण चित्रपटापासून ते कथा-कादंबर्यांपर्यंत प्रेम हा विषय पाहिलेला ऐकलेला असतो. काहीवेळा आपल्या आसपासही काही प्रेमकहाण्या फुलताना, विझताना आपण पाहिलेल्या असतात. मुख्यत्वेकरून विझताना, संपतानाच. आपल्यासाठी एक प्रेमकहाणी संपली इतकाच विषय असतो. प्रेमीजीव काही दिवस झुरतील अन पुन्हा सगळं सुरळित होईल. मुलीच्याबाबतीत तर तिचं लग्न लावून दिलं की कुटुंबियांना कर्तव्यपूर्तीचा केवढा तरी आनंद. मात्र या सगळ्यात खरचं प्रेमभंगानंतर किंवा स्वत: प्रेमात कच खाल्ल्यानंतर एखाद्या स्त्रीची मनोवस्था काय होईल. परंपरांच्या कलेनं जाणार्या, प्रेम हवं असणार्या पण चौकटी मोडू पाहणार्या या स्त्रीची अवस्था कशी असेल हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी. सर्वसामान्य मुलींसाठी प्रेम करतानाही भीती आणि लग्न झाल्यानंतर ही होऊन गेलेल्या प्रेमाची हकीकत कळू नये याची भीती. कादंबरीत तर तिच्यादृष्टीनं सारी भीती, आठवणी आता झिरझिरीत झालीये असं वाटत असातनाच तो परततो आणिउद्या 1 वाजता भेटायला ये..नाही आलीस तर मी दोन वाजता घरात येतो असं म्हणून वादळासारखं निघून जातो. या एका वाक्यात लपलेलं दडपण, तिची अस्वस्थता, तिची उलघाल, उलथापालथ, भीती लेखकानं अतिशय सूक्ष्मरित्या आणि वास्तवादी टिपलयं.
मुळात, आपल्याकडे, पालकांना अपत्यांवर मालकी हक्क वाटत राहतो आणि त्याच संस्कारांनी मुलांनाही पालकांनी आपल्याला जगात आणून आपल्यावर उपकार केले आहेत असंचं वाटत राहतं. त्यामुळे त्यांच्या विषयीचा आदर किंवा त्यांचा जाच सहन करणे हा ही त्या उपकाराच्या परतफेडीचाच भाग वाटत राहतो. अशा परिस्थितीत मुलांविषयी पालकांना काळजी वाटणे आणि मुलांना पालकांविषयी आदर वाटतो असं जे आपण म्हणत राहतो, त्यावेळी त्यातील काळजी अन आदर शब्दांचे खरे अर्थच भिन्न होऊन जातात. ही रचनाच तशी आहे. अन इतकीच नाहीये. बाकी अनेक प्रकारचे रंग त्याला आहेत. जातींची, धर्माची,लिंगभेदाची, आर्थिकतेची त्यातही पुन्हा एक एक पदर उलगडत आणखी नव्या नव्या चौकटी. अशा आपल्या रीती नीतीच्या समाजात, प्रेम करणं हे एखाद्या सर्वसामान्य स्त्रीसाठी केवढी अवघड, घाणेरडी अवस्था आहे. एकवेळ लफडं करणं सोप्पयं पण प्रेम नाही.
कांदबरीत एके ठिकाणी ती तिच्या मन मारत जगण्याचा, कोंडवाडा झालेल्या आयुष्याचा, बदनामीच्या भितीचा आणि िंबंग फुटलं तर त्यामुळे होणार्या परिणामांचा विचार करत असते त्यावेळेस तिच्या लक्षात येते, प्रेम केल्याची शिक्षा फक्त तिलाच मिळतेय. त्याचं नाव पेपरात येतं, टीव्हीवर दिसतं म्हणजे त्याचं प्रेमाशिवाय सुरू असलेलं आयुष्य सुरेख सुरू आहे. त्यात तो पुढेही गेला मग कोंडवाडा मलाच का?हा प्रश् आपल्यालाही अस्वस्थ करतोया प्रश्नाचं उत्तर आपल्या सामाजिक व्यवस्थेत कधी मिळेल हे सांगणं अवघडचं.
कादंबरीतील मुख्य दोन पात्रांना नावं नाहीयेत. तिचं पात्र ती म्हणून येतं अन त्याचं तो म्हणून. अन बाकीचे सुद्धा तिचा भाऊ, त्याची आई, बहिणी, नवरा, दीर अशाच स्वरूपात. ही गोष्ट मला विशेष चांगली वाटली कारण ती कोणाही तिची आणि कोणाही त्याची गोष्ट आहे. अमूक तमूक समाजातच नव्हे तर आपल्या एकूण समाजात सर्वच धर्मांमध्ये प्रेमाच्या कहाण्या अशाच रीतीनं जातात. त्यामुळं पात्र बिननावी आहेत हे चांगलचं आहे. पुस्तकाचं गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं मुखपृष्ठही चांगलं झालयं. कांदबरी वाचनीय झालेली असताना, संवादांच्या वा स्वगताच्या ठिकाणी कुठेच अवतरण चिन्ह नाहीत. अक्षरजुळणीतील ही गोष्ट खटकते. ती दुरूस्त झाल्यास संवाद अधिक प्रभावी वाटतील.
पुस्तकाच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट जाणवत राहिली, समाज नियमांना आपल्या अनुवांशिक पद्धतीने जगताना, प्रेम करणं जसं अवघड आहे तसचं केलेलं प्रेम विसरणं. केलेल्या प्रेमाची भूतं जेव्हा वर्तमानात येऊन नाचू लागतात तेव्हाही या भूतांसह जगणं अवघड असतं. त्यालाही अर्थात कारण हेच बेड्याघालू समाज.



चिमूटभर रूढीबाज आभाळाला धुतकारून प्रेम करता आलं पाहिजे आणि त्यासह जगताही!

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...