बुधवार, १४ डिसेंबर, २०११

ई-व्यसनाचा विळखा

न सांगता, आतल्या आत गुदमरवून टाकणार्‍या आधुनिक ई-व्यसनाचा विळखा..

किती तास असता नेटवर? काय करता? काम करून झाल्यानंतरही लॉग आऊट व्हावसं वाटत नाही? कमेन्टस्, लाईक पासून ते ‘’ पर्यंत सगळीकडेच अडकायला होतं. सोडवत नाही एकदा कॉम्प्युटरवर बसल्यानंतर? तुमचं होतंय असं? मग जरा सावधान.. कारण ही ई-व्यसनाची लक्षणं असू शकतात ! 

तुझंही असंच होतं??
‘हे., गेम आता माहीत झालीये. तिसर्‍या राऊंडपर्यंंत पोहोचलेय; पण पुढे काही गाडी सरकेना. चाहे जो भी हो, हा राऊंड पार केल्याशिवाय जेवायला उठणारच नाही.’ 
‘माथेरानच्या ट्रीपला नुकतीच जाऊन आलेय, दहा मिनिटांपूर्वी फेसबुकवर फोटो अपलोड केलेत. बघते ना, काही कॉमेन्टस आल्यात का?’
हे असंचं, सेम टु सेम तुलाही होतं. काय म्हणून काय विचारतोस, असं म्हणजे सतत इंटरनेटच्या खिडकीतून डोकवा डोकवी केल्यावाचून चैनच मिळत नाही, असं? सतत कॉम्प्युटर उघडून त्यात तोंड खुपसून बसावसं वाटतं? उगीचच..कारण असो वा नसो कामाच्या साईटस पाहून झाल्या तरी इंटरनेटला बाय बाय म्हणावसंचं वाटतं नाही, असं. असं होतं? 
असं कधी तरी होणं हे ठीक आहे रे. कामासाठी नेटच्या संपर्कात राहणं, इट्स ओके. कामाशिवाय फालतू टाईमपास करण्यासाठी अर्धा-एक तास नेटवर सैर करणंसुद्धा नॉट अ प्रोब्लेम. इतना तो तेरा हक बनता है यार. पण दिवसाला आठ-आठ, बारा-बारा, पंधरा-पंधरा तास नेटवर बसतोस? 
काय? उत्तर हो आहे. तो बेटा दिल थामो कुछ तो गडबड है. सतत सतत इंटरनेटच्या व्हर्चुअल जगण्यातच मौज वाटणं हे चांगलं लक्षणं नाहीये. दिवसातील तासन्तास नाठाळासारखे फेसबुक, टीटर, ऑकरुट, जी-टॉक, गेम्स साईट किंवा मग त्या ‘फुल्या फुल्यां’च्या साईटसवर ऑनलाईन राहण्याचा शौक असेल, तर ही एक प्रकारची नशा आहे आणि कोणत्याही प्रकारचा नशा वाईटच मित्रा.
तुला सांगते, आजच्या युगात हे एक नवं ई-व्यसन उदयास आलं आहे. खर्‍या-खुर्‍या आयुष्यातून ऑफलाईन होऊन जगभरच्या सोशल साईट्सवर ऑनलाईन होण्याचं फॅड म्हणजे हे व्यसन आहे. आता तू कपाळावर आठय़ा पाडून, नाक फुगवून चेहरा भलताच रागीट करून विचारशील ‘नेटसॅव्ही असणं ही आजची काळाची गरज झालेली असताना तुला कुठल्या उपटसुंभाने सांगितलं, इंटरनेटच्या जगात वावरणं हे व्यसन आहे म्हणून. ही नशा मजा देणारी आहे. उगीच भलत्याच गोष्टी डोक्यात घालून घेऊ नकोस.’
सॉरी टू से; पण मला सांग आपण व्यसन कशाला म्हणतो? नाही म्हणजे, सांग ना? एखादी गोष्ट हवीशी वाटणं आणि मग ती मिळवणं किंवा करणं हे नॉर्मल आहे. त्यात चूक ते काहीच नाही; पण एखाद्या र्मयादेपेक्षा जास्त वेळा एखाद्या गोष्टीचं वेड लागणं आणि मग ते न मिळाल्याने अस्वस्थ वाटणं, चुकचुकल्यासारखं होणं, त्रास होणं हे काय आहे मित्रा. एखाद्या गोष्टीची गरज संपून चटक लागणं हे व्यसन नाही तर आणखी काय? 
जस्ट इमॅजिन, आपण चारचौघात उभं आहोत. अवतीभवती माणसं आहेत. नुसती माणसं नाहीत तर आपल्याला घट्ट सख्यं वाटणारी आपली माणसं आहेत. तरीही आपण सारखं सारखं मोबाईलचा कि पॅड अनलॉक्ड करतो. कधी वेळ पाहतो. कधी उगीच मेसेज आणि काहीवेळा भवतीच्या जिवंत माणसांचा कंटाळा वाटून जी-टॉकवर ‘हाय, हेलो’ करून प्रतिसादाची वाट पाहत राहतो, याला काय म्हणायचं मित्रा. 
हे तंत्रज्ञानाचं युग आहे ठाऊक आहे. टेक्नोसॅव्ही, इंटरनेटसॅव्ही असण्याशिवाय पर्याय नाही मान्य. पण म्हणून तासन्तास असं बिनकामाचं राहायचं? दिवसाच्या चोवीस तासातील अनेक तास भोवतीच्या जिवंत जगाशी फारकत घेऊन आभासी जगणं खरा-खुरा आनंद देऊ शकेल का, याचा तूच विचार कर आणि सांग. मला हे कळलंय म्हणून मी माझ्यापुरतं उत्तर शोधलंय.. तू काय ठरवतोयस??
***

इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार इतक्या वेगाने होत आहे की, या लाटेत हरवून जाणार्‍या तरुणांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या जगासमोरच ‘ई-व्यसनाधीनता’ ही एक समस्या झाली आहे. चीन-अमेरिकेत व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाली आहेत. इथे तर इंटरनेट वापरासाठी नियम-कायदे करण्याची 
धडपड सुरू झाली आहे. कोरियामध्ये हा प्रश्न डोकं वर काढत आहे. भारताची परिस्थितीही वेगळी राहिलेली नाही. इंटरनेटच्या आहारी जाऊन आपलं भविष्य पणाला लावलं जात आहे. पूर्वीसारखं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची गरजही आता उरली नाही. हातातील मोबाइलमध्ये चालता-बोलता सहज इंटरनेटचं जगं तुमच्या पुढय़ात उभं राहत आहे. ई-व्यसन हा एक मानसिक आजार असल्याचंही काही देशांत गणलं जात आहे. एखादी गोष्ट न मिळाल्यावर वाटणारी अस्वस्थता, चिडचिडेपणा, नैराश्य ही सगळी लक्षणं इंटरनेटसॅव्ही तरुणांना इंटरनेट न दिल्यावर होत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी जसे उपाय योजावे लागतात तसेच उपाय या व्यसनातून बाहेर पडण्यासाठीही करावेच लागतात.
पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रावर ई-व्यसनी तरुणांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. ई-व्यसन आणि त्याचे परिणाम ही नेमकी भानगड काय आहे हे समजावून घेणं आणि ‘ऑक्सिजन’च्या वाचक मित्रमैत्रिणींना समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे. याचसाठी मुक्तांगण व्यसनमुक्क्ती केंद्राच्या उपसंचालिका ‘मुक्ता पुणतांबेकर’ यांच्याशी ‘ऑक्सिजन’ने विशेष संवाद साधला.
१२-१५ तास जातात नेटवर?
‘मुलं १२-१५ जर तास इंटरनेटला पुढय़ात घेऊन बसायला लागली, तर हे नॉर्मल नाही, असं समजावं. इतका वेळ जर ते नेटवर वाया घालवत असतील तर त्यांना वेळीच यातून बाहेर काढण्याची गरज आहे. सध्या मुक्तांगणमध्ये येणार्‍या मुलांची संख्या आणि याविषयीची विचारणा पाहता १५ ते २२ हा वयोगट सर्वाधिक सेन्सिटीव्ह आहे. मुळातच हे वय फार सारासार विचार करणारं नसतं. शिवाय शारीरिक कष्ट केल्याखेरीज जर तुम्हाला तथाकथित आनंद मिळणार असेल, तर तो कुणाला नको आहे? हीच परिस्थिती या मुलांची होते आणि हळूहळू त्यांचे इंटरनेटवरचे तास वाढून व्यसनात रूपांतरित होतात. 
मध्यम-उच्च मध्यम वर्गात हे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. घरच्या घरी इंटरनेटची सोय झाल्याने मुलांना बाहेर जाण्याची गरजच उरलेली नाही. पालकांचं मुलांवरील थेट नियंत्रणच कमी होताना दिसत आहे. या उलट, आपल्या चिमुकल्या-चिमुकलीला सहज इंटरनेट वापरता येतो, कॉम्प्युटर किती मस्त हाताळतोय याचीच पालकांना गंमत वाटते. लहानगी मुले खोटी वय टाकून सोशल साईट्सवर एन्ट्री मिळवत आहेत. तंत्रज्ञानाविषयीची माहिती पालकांपेक्षा मुलांना जास्त असल्याने सहज त्यांना वेडात काढण्यात येत आहे. मुलांच्या कौतुकात वाहून जाताना पालकांनीही तारतम्य सोडले आहे. शिवाय काही वेळा मुलांना घरात बंद करून पालक पाटर्य़ांना जातात, मिटिंग्जसाठी बाहेर पडतात. इतर कोणीच घरी नसल्याने मुलं काय करायचं म्हणून नेटशी खेळत राहतात आणि त्यातच गुंतून पडतात.
मुक्तांगणवर नुकतीच एका सात वर्षाच्या मुलीच्या पालकांनी विचारणा केली आहे. या मुलीने खोटं वय टाकून फेसबुकवर अकाउंट उघडलं होतं. (पोरीची कमालच म्हणावी!) तिची फ्रेंड रिक्वेस्ट मुलीच्या आईच्या मैत्रिणींना मिळू लागली, यावरून ती फेसबुकवर असल्याचं उघड झालं. असे प्रकार पालकांच्या अपरोक्ष नक्कीच घडत असतील. यामुळे पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. दोन्ही पालक नोकरी करणारे असोत वा आई गृहिणी, आपलं मूल नेमकं काय करतंय, त्याच्या विश्‍वात कसली उलथापालथ सुरू आहे याचा कानोसा सतत पालकांनी घेतला पाहिजे. मुक्तांगणवर विचारणा होणार्‍या मुलांपैकी बहुतेकांच्या आया या गृहिणी आहेत, त्यामुळे नोकरी करणार्‍या महिलांमुळेच मुले बिघडत आहेत, हा विचारही साफ चुकीचा आहे.
मुक्तांगणवर पुण्याबाहेरूनही फोन येतात. फोनवर शक्य झाल्यास किंवा तेथील स्थानिक समुपदेशकाकडे मुले पाठविली जातात. मात्र, मुलांपेक्षा पालकांनाच समुपदेशन करण्याकडे मुक्तांगणने लक्ष पुरविले आहे. पाल्याच्या विकासामध्ये पालकांची जबाबदारी मोठी असते. मुलांना समजावून सांगितले तरी त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष जर पालकांनी ठेवले नाही तर पुन्हा ते या प्रकारात अडकू शकतात. पालकांनी घरात असणं आणि मुलांवर लक्ष ठेवणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आम्ही घरात आहोत आमची मुले बिघडणार नाही, अशी खोट्या समजात कुणीही राहू नका. त्यापेक्षा आपल्या पाल्याच्या बंद खोलीचा दरवाजा थोडासा ढकलून बघा.. कदाचित अजूनही त्याच्या मनापर्यंंत आपली हाक आणि आपला धाक टिकून असेल..!!

oxygen

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...