शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

प्रॅक्टीकल


प्रिय... डिअर..
मित्र
एक जण (हे ठीक)
.....तर किती तरी वेळ मी आपल्या गप्पागोष्टी वाचून अस्वस्थ झाले. मी किती तोडून तोडून वागले ना... तुझं बोलणं मध्येच तोडत फार घाई असल्यासारखं कितीदा बाय केलंय. तू सुरू केलेल्या प्रत्येक गप्पांचा मी शेवट केलाय. तुला काही सांगायचंय का हेही समजून न घेता सरळ बोलणंं खुंटवलं. तुझ्या गप्पांत तू कितीदा विचारलंस, ‘‘कुठंयस तू आत्ता?’’ आणि मी प्रत्येकवेळी उत्तर देऊन ऑफलाईन झालेय. तू का विचारायचा मला हा प्रश्‍न. मी उत्तर दिल्यावर तू काय म्हणणार होतास, ‘थांब येतोच तुझ्या ऑफिसकडे, घराखाली, गाडीपाशीकिंवा कुठेही, मी जिथे कुठं असेल तिथे की नुसतंच म्हणणार होतास, ‘नीट जा, सांभाळून जाकि काहीच म्हणणार नव्हतास. फक्त एक रीत म्हणून विचारत होता. आता कसं मी हे ठरवू. मी असं प्रत्येकचवेळी तुझी संधी हिसकावून घेतली. पुढचं तुझं काहीही ऐकून न घेता माझं ऐकवून कानांची झापडं बंद करून घेतली. डोळ्यांपुढची स्क्रीन ऑफ करून टाकली. तरी तू बोललाच अशील मनातल्या मनात, पुटपुटला असशील किंवा टायपलेही असतील अक्षरं. पण एंटर मारल्यावर दिसलं असेल वुई कान्ट सेड धिस मेसेज ऍज पर्सन इज नॉट ऑनलाईनकिंवा विल सेंड धिस मेसेज व्हेन पर्सन इज ऑनलाईन.पण मला अशी कुठलीच उत्तरं नंतरही नाही मिळाली. केवढं दुखावलं ना मी तुला...तरीही दुखावतच राहिले, पुन्हा पुन्हा.
कधी मधी तू माझ्याविषयी मलाच सांगायचा... कशी वाटली क्लिओपात्रा?’ मी म्हणायचे, तू कुठं होतास एनएफएआयमध्ये पिक्चर पहायला. मग तू स्माईली टाकल्यावर, मीही जरा चिडून विचारायचे, ‘‘कोण होता रे तो चोमडा.’’ त्यावरही तुझी ठरलेली स्माईली.
काही-काही वेळा तर किती असहाय, अगतीकपणे म्हणायचा, ‘‘कशाला चिडतेस गं, किती रागावतेस. प्लीज अशी चिडू नकोस, मला जरा समजून घे. मला खूप त्रास होतो.’’  मी तर समजूनच घ्यायचे. किमान मलातरी तसंच वाटत होतं तेव्हा. मी तुला जरूरतसे ज्यादा समजून घेते और जरूरतसे ज्यादा छूटभी देत होते. पण तू प्रत्येकवेळी मी चिडल्यावर हेच म्हणायचा, ‘‘जरा समजून घे ना माझी अवस्था.’’ आज ते वाचताना खूप खूप अंगावर आलं. मी इतकं तुला अगतिक केलं होतं? की सरळ तुला माझ्यावर चिडून माझ्यापासून दूर होताही येत नव्हतं. हॅट साली, काय तुला भाव द्यायचाय.असं तोंडावर नाहीतर किमान मागं तरी म्हणून खूप खूप लांब नाही पळून जाता आलं.  का? उलट माझीच मनधरणी, विनवणी करावीशी वाटायची? हे काय असतं वेड्या. प्रेमबीम? पण मी तर खूप प्रॅक्टिकल मुलगी होते-आहे. शिवाय गाढवासारखी झापडं लावून जगणारी. मला इकडं ना तिकडं बघायचं होतं, ना आहे. तेव्हाही तर ना मला तुला पाहायचं होतं. ना तुझ्या सो कॉल्ड प्रेमाला किंवा आकर्षणाला. (तू आत्ता ठामपणे हे सांगू करू शकतोस.) तुझ्यावर प्रेम करणारी किती मित्र आणि मैत्रिणी. केवढं डोकं खायचे माझं. तासनतास माझ्या मनाला समजवत बसायचे. मी टस्स की मस हलले नव्हते. तीळमात्र संशय यावा असंही वागत नव्हते तरीही ते पुन्हा पुन्हा तुझी खोटी समजूत काढायचे, ‘अरे आज नाहीतर उद्या मानेल रे.
 तुझ्यावर हे असं प्रेम करणार्‍या मित्र आणि मैत्रिणींना माझ्याकडून शंभर लाथा. मी तुझं काहीही वाट्टोळं केेलेलं नाही, झालंच असेल तर ते तुझ्या या वायझेड मित्रांनीच केलंय. तसंही म्हणा कुठं तुझं काय वाट्टोळं बिट्टोळं झालंय. मस्त मजेत आहेस की आणि खूशाल बापबिप पण झालायस. तरीही तरीही आणि तरीही मी आपल्या तेव्हाच्या गप्पागोष्टी वाचून आज अस्वस्थ झाले. मी काही भावनिक नाहीये. आधीच सांगितलं ना मी खूप प्रॅक्टिकल मुलगी पण मला वाईट वाटलं. आपण कुणाशी तरी सतत सतत तोडून वागलो. काही काळ तरी तुला मोडून पडताना पाहिलं तरी दुर्लक्ष केलं. तू म्हणायचा की, ‘‘अगं मैत्रिण तरी राहशील ना!’’ अन् मी खूशाल म्हणायचे, ‘‘तसली ब्यादच नको आपल्याला. तुझ्या मनात एक आणि ओठात एक असणार. ती भानगडच नको. एक तर तू ठरव तुला मित्र व्हायचंय की आणखी काही व्हायची मनिषा आहे. दोघांत तडजोड नाही करायची. एक फायनल कर.’’
 तू म्हणायचा, ‘‘किती निष्ठुरासारखं बोलतेस गं. असं कधी होतं का?’’ मग मी तुझं अर्धवट वाक्य तोडून वळायला लागले की म्हणायचा, ‘‘थोडा वेळ तर दे. जमेल हळूहळू. पण तुझं दुरावणं सहन करण्याचं बळ तर एकवटू दे. ते मला तुझ्या सहवासातच मिळेल. ’’
माझं त्यावरही उत्तर तयारच असायचं, हजरजबाबीच ना..‘‘तोडायला कशाला वेळ लागतो आणि बळही. तोडायचं म्हटलं की तुटतं. जोडायचं म्हटलं की वेळ लागतो आणि बळही लागते. ’’
मग तू काहीच नाही बोलला. कधीच नाही बोलला. तू तुझं फायनल केलंस आणि माझं तर फायनलच होतं. तू थांबला, तुझं बोलणं थांबल, तुझी पत्रं थांबली, तुझे मेल्स थांबले, तुझ्या गप्पागोष्टी थांबल्या. एकूण सगळं थांबलं. तू वाट बदलली आणि तिथून नव्यानं वाढत गेलासं. मीही माझ्या माझ्या आयुष्यात वाढत गेले. मला यातल्या कुठल्याच गोष्टीचा रिग्रेट नाही. कशाचं वाईटही वाटत नाहीये.
पण आज या सार्‍या गप्पा गोष्टी वाचताना राहून राहून मनात येतंंय, तू त्या दिवशी नक्की फायनल काय केलं होतं? तुझ्या मनीषेवर काट मारली की माझा मित्र होण्यावर फुली मारलीस? मनाच्या एका कोपर्‍यात मला, माझ्या आठवणींना ढकलून दिलंस की मनातून साफ हाकललंस? तोडणं जे अशक्य वाटत होतं ते तोडलस की जोडणं जे अशक्य होतं ते तोडलंस?
नाही, नाही. जाब नाही विचारत रे. आपल्याला भानगडी आवडतचं नाहीत.
मी प्रॅक्टीकल आहे ना त्यामुळे कुतुहल चाळवलं, उत्सुकता वाटली. बाकी काही नाही. आणि हो अस्वस्थ झाले यातून काही गैरसमज करून घेऊ नकोस, तुझे मुर्ख मित्र जसे अन्वयार्थ लावायचे तसे. अस्वस्थ होणं ही काय भावना नाही रे ती आपली मेंदूची एक प्रतिक्र्र्रिया आहे. काही पाहिलं,वाचलं, ऐकलं की वाटणारी प्रतिक्रिया. बस्स इतकंच अस्वस्थ होण्याचा अर्थ!
उत्तर जमल्यास कळवं. अर्थात अजून तुझ्या लिस्टमधून तू अनफ्रेंड केलं नसशील तर...! आणि उत्तराची वाट पाहतेय असं मुळीच नाही म्हणणार...सांगितलं ना मी खूप प्रॅक्...... !!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा